(दैनिक लोकांकित --विवेक कुचेकर)नागपूर प्रतिनिधी, दि. ४ - हे प्रशासन किती कुचकामी आहे शिवाय जातीयवादी गुंडांवर यांचा वचक नसल्याने हे गावगुंड पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील अरविंद बनसोड हत्या प्रकरणातील आरोपींनी आता गावातील नागरिकांना दमदाटी करण्यास सुरुवात केली असून त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष देऊ नये म्हणून गेले पंधरा दिवस गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तर काहींना आपल्या मनाप्रमाणे साक्ष देण्यास सांगितले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अरविंद बनसोडच्या घरी जाऊन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
नागपुरातील थडीपवनी येथे अरविंद बनसोड याची राजकीय गाव गुंडांनी निर्घुणपणे हत्या केली होती. या गुंडांना राजाश्रय असल्याने पोलिसांनी दबावाखाली येऊन ही हत्या असतानाही आत्महत्या असल्याची नोंद केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी दिखाऊपणाची कारवाई केली. तरीही या कारवाईला आरोपींनी भीक घातली नाही, आरोपींनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गावात दहशतीचं वातावरण निर्माण केले असून गेले पंधरा दिवस ते गावकऱ्यांना दमदाटी करीत आपल्या बाजूने साक्ष द्यायला सांगत आहे. याबाबतची तक्रार गावकऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केल्यावर त्यांनी लगेचच वंचितच्या पदाधिकार्यांना गावात जाऊन गावकऱ्यांना भेटायला सांगितले. त्यानुसार वंचितचे नागपूर जिल्हा प्रवक्ते सुमेध गोंडाने, संजय हेडाऊ, राजू लोखंडे, राहुल वानखेडे, इंगळे, माहीले, पाटील, गौरखेडे, देशभ्रतार व नारनवरे यांनी गावात जाऊन बनसोडच्या कुटुंबीयांची तसेच गावकऱ्यांची बैठक घेतली. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कोणत्याही प्रकारे घाबरायचे कारण नाही गावात लवकरच पोलीस चौकी देण्याबाबत प्रयत्न केले जात आहे. त्याबाबतचे निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, गोदाबाई बडोले यांची मालकी असलेल्या जमिनीच्या प्रकरणात ग्रामपंचायतीने केलेल्या अन्याय व मारहाणीबाबत कार्यकर्त्यांनी चौकशी करून गोदाबाई यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना व कुटुंबियांना मदतीचे आश्वासन दिले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.