लॉकडाऊनच्या काळातही झाले पहिले अवयवदान
महिलेने केले मृत्युपश्चात्त यकृत दान, एक जीव वाचवला
कल्याण- लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या भितीने मंदावलेली अवयव दानाची प्रक्रिया आज कल्याणमधील एका घटनेने जागृत झाली. एका ६१ वर्षीय महिलेने मृत्यपश्चात्त केलेल्या अवयव दानामुळे ६४ वर्षीय जेष्ठ नागिरकाला जीवदान मिळाले.
कल्याण येथील फोर्टीस रूग्णालयात अपघातात गंभीर जखमी झालेली एक ६१ वर्षीय महिला दाखल झाली होती. मात्र तिची प्रकृती खालावल्याने अखेरीस डॉक्टरानी तिला ब्रेन डेड म्हणून जाहीर केले. सदर महिलेने मृत्युपश्चात्त आपले अवयव दान करावे अशी इच्छा जिवंतपणीच केली होती. सदर महिलेच्या पश्चात्त मुलगा, सून व मुलगी आहे. आईच्या इच्छेनुसार सदर महिलेच्या मुलांनी देखील अवयव दानासाठी मंजूरी दिली. त्यानंतर फोर्टीस रूग्णालयाने हालचाली सुरू करून सदर महिलेचे यकृत मुंबईतील एका रूग्णाला देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत एका खासगी रूग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आणि त्यामुळे ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाला पुर्नजीवन मिळाले. फोर्टीस हॉस्पीटलचे क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील, न्युरोलॉजीस्ट डॉ. राकेश लल्ला यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक या कामासाठी सज्ज करण्यात आले होते.
अवयव दानाबद्दल बोलताना फोर्टीस कल्याणच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या की, अनेक आव्हाने व कोरानाचे संकट असतानाही सदर महिलेच्या कुटुंबाने अवयव दानास संमती दिली, रूग्णालय स्टाफ. नर्सिंग स्टाफ, झेडटीसी मुंबई, मेडीकल सोशल वर्कर तसेच पोलीस व नातेवाईकांचे सहकार्य यामुळे कोरोनाच्या काळातील हे पहिले अवयव दान यशस्वी पार पाडले आणि एक जीव वाचवण्यात आम्हाला यश आले.
सदर महिलेच्या मुलाने सांगितले की, मृत्यूनंतर आपले अवयव दान करावे अशी इच्छा आईची होती. तिच्या मृत्यूनंतर केलेल्या अवयव दानामुळे एक जीव वाचवू शकलो हाच मोठा आनंद आहे.